
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश असून २०२३-२४ खरीप हंगामातील पीक विम्याच्या मंजूर रकमेची राज्य सरकारकडून तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ साठी शासनाने नियुक्त केलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो. या कंपनीच्या कार्यक्षेत्रात अहिल्यानगर, नाशिक, सातारा, सोलापूर, जळगाव आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा सामावेश होतो. या जिल्ह्यांसाठी पीक विम्याची एकूण ७,६२१ कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली होती, यापैकी ५,४५९ कोटी रुपये पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच जमा झाले होते. परंतु विमा कंपनीच्या नियमांच्या पुढील रक्कम राज्य सरकारने देणं भाग होते. मात्र सरकारने त्याची अजूनपर्यंत तरतूद केली नव्हती, त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला . याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्र शासनाकडून विमा कंपन्यांना पीक विम्याची मंजूर रक्कम देण्यात यावी आणि नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावे अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून पीक विम्याची मंजूर रक्कम पीक विमा कंपनीला वितरीत करण्यास शासनाक़डून मान्यता देण्यात असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा कऱण्याचे आदेश शासनाकडून पीक विमा कंपनीला देण्यात आले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी प्रशासनाच्या सहकार्याने, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्वतःची यंत्रणा राबवून गेल्या वर्षी शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे फॉर्म भरून घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यात पीक विमा भरण्यात कर्जत-जामखेड मतदारसंघाचा अव्वल क्रमांक होता. केवळ फॉर्म भरण्यापुरतेच आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न केले नाही तर पीक विमा हा नियमात बसताच तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अधिकारी, मंत्री आणि विमा कंपन्यांकडे पाठपुरावाही केला होता. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि हिवाळी अधिवेशनातही त्यांनी या विषयांवर आवाज उठवला होता. यापूर्वीही आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचे १४३ कोटी ५५ लाख रुपये मिळाले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच शासनाने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला पीक विम्याची मंजूर रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. नुकसानभरपाई मिळणार असल्याने बळीराजा सुखावला असून, लवकरच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.
कोट
कर्जत-जामखेड मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख म्हणून मी नेहमीच मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी काम करत आलो आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक विषयाचा कसोशिने पाठपुरावा केला आणि त्याला त्या-त्या वेळी यशही आले. भविष्यातही सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच मतदारसंघासाठी असंच काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. मंजूर झालेला पीक विमा पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. याबाबत काही अडचण आल्यास कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी अथवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा.’’
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)






