पंढरीची वारी म्हणजे आधुनिक विज्ञानास न उलगडलेलं, न उमगलेलं अनाकलनीय असं गुपित…. वारीला जायचं म्हटलं की त्या वारकऱ्यांच्या अंगात एक चेतनामय ऊर्जा संचारते..
त्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलं पंढरीची वाट चालतात…मग साठ, सत्तर वर्षाची ती थरथरती पावलं सोळा वर्षांच्या तारुण्यात प्रवेशतात … कुठून येतं ते अफाट असं चैतन्य, हे मात्र अनाकलनीय….
वारी म्हणजे जात, धर्म ,पंथ ,भाषा ,लिंग, गरिबी श्रीमंती , वैचारिकता या समाज दुभंगणाऱ्या विकारांची होळी ….
अहंकाराचं वस्त्रहरण करणारा क्षण म्हणजे वारी.. माणसात मानवता असतेच याचं दर्शन घडवणारी म्हणजे वारी… या वारीची अनेक रूपं आहेत.. या लाखोंच्या मेळ्यात कोणत्या रूपात पांडुरंग भेटेल, बोलेल, कळेल आणि जाणवेल हे शेवटी आपल्या विचारांवर आणि दृष्टीवर ……
ह्या दिंडी सोहळ्याच्या प्रसन्नमय वातावरणात संपूर्ण वाकणवाडीकरांनी सहभाग घेतला. वाडीतील सर्व घरांच्या समोरील सडा रांगोळीने वातावरण प्रफुल्लित झाले. टाळ मृदुंगाच्या गजरात भजन गायनाने वातावरण भक्तीमय झाले.
शाळेपासून निघालेली दिंडी वाडीच्या मुख्य चौकात आली व रिंगण सोहळ्याने चौक गजबजला या रिंगण सोहळ्यात अनेक महिला शाळेतील मुले अबाल वृध्द या सर्वांनी फुगडीचा आनंद लुटला.
या दिंडी सोहळ्यासाठी वाडीतील भजनी मंडळ सर्व श्री ह.भ.प पठारे महाराज, संतोष वायसे, चंद्रकांत तापकीर, मारूती पठारे, परभती तापकीर, पंडीत वायसे, कुशाबा वायसे, अमृत पठारे, प्रविण तापकीर व दोन्ही शिक्षक दिगंबर वाळके, अमोल गांगर्डे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.या बालवारकरी दिंडी सोहळ्याचे सर्वत्र तोंडभरून कौतुक होत आहे.






