ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषाने दुमदुमले कर्जत 

Google search engine

 

त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या संतश्रेष्ठ श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे काल कर्जत शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालखी रथाचे प्रमुख ह.भ.प. मोहन महाराज बेलापुरकर यांच्यासह सेवेकरी, मानकरी – पुजेकरी यांचा सन्मान कर्जतचे ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सदगुरु गोदड महाराज यात्रा कमिटी, तालुका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानोबा- माऊली- तुकाराम आणि जय हरीच्या जयघोषणेने शहर व परिसर भक्तिरसात चिंब झाले होते . शहरात ठिकठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाचे दर्शन भाविक घेत होते.

रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात आगमन झाले. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे प्रमुख ह.भ.प मोहन महाराज बेलापुरकर यांच्यासह त्यांच्या सोबत असणारे पालखीचे सेवेकरी, मानकरी आणि पुजेकरी यांचा सन्मान कर्जत शहराच्यावतीने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. पालखी रथ आणि सोबत असणाऱ्या सर्व दिंडीतील वारकरी-भाविकांचे फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षक रांगोळी, फुलांची उधळण तसेच डायनॅमिक इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या झांज पथकाच्या तालात पालखी शहरात दाखल झाली. शहरातील चौकाचौकात पालखीचे दर्शन भाविक घेताना दिसत होते. पालखीतील वारकरी डोक्यावर तुळस, हातात टाळ, वीणा घेत ज्ञानोबा- माऊली- तुकाराम अशा भक्तीभावात वारकऱ्यांसह मुस्लिम भाविक देखील रंगून गेले होते. यंदा पालखी मुक्काम असणाऱ्या महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पालखी पोहचली असता याठिकाणी आरती करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनाच्यावतीने जेवणाची पंगत, चहा- पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनाने कर्जत शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. जयहरीच्या घोषणेने शहर भक्तिमय रसात न्हाऊन निघाले. पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था राखत वाहतुकीचे नियंत्रण करीत वारकरी-भाविकांना पालखीस्थळी पोहच करण्यात महत्वाची भूमिका निभावली. तर वारकऱ्याची आरोग्य सेवा राखण्यात विविध ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. यासह कर्जत नगरपंचायतीने पालखी मुक्काम ठिकाणी तसेच वारकऱ्यांची निवास ठिकाणी फिरते शौचालय, पाण्याची तजवीज केली होती. यावेळी प्रशासनाकडून तहसीलदार गुरू बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे, प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे, प्राचार्य डॉ.संजय नगरकर, आ .रोहीत पवार यांचे वडील राजेंद्र पवार, नगराध्यक्षा उषा राऊत, प्रवीण घुले, अंबादास पिसाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नामदेव राऊत, विशाल मेहेत्रे, सचिन घुले, सुनील शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.