

आदरणीय शरद पवार साहेब शनिवारी जामखेड दौर्यावर येत आहेत. ते गेल्या पन्नास साठ वर्षांपासून देशाच्या राजकारणात आहेत. त्यामुळे त्यांना राजशिष्टार चांगला माहित आहे, काल कुसडगाव एसआरपीएफ सेंटरमध्ये त्यांच्या नातवाने स्टंट केला, एसआरपीएफ व पोलिसांना वेठीस धरले. यावेळी त्यांनी नातवाचा कालचा स्टंट बरोबर होता की चुकीचा होता हे सांगून राजशिष्टाचार काय असतो हे त्यांनी कर्जत-जामखेडसह राज्यातील जनतेला सांगितले पाहीजे, असे भाष्य आमदार राम शिंदे यांनी केले.
आमदार राम शिंदे यांची गावभेट जनसंवाद पदयात्रा जामखेड तालुक्यात सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून आमदार शिंदे गावोगावी जाऊन सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत आहेत. आज शुक्रवारी ते कुसडगाव दौर्यावर होते. कुसडगाव ग्रामस्थांनी त्यांचे यावेळी जंगी स्वागत केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरिल भाष्य केले. यावेळी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात, डाॅ . मुरूमकर, सुरवसे, शरद कार्ले, संजय (काका) काशिद, सोमनाथ पाचरणे, पांडुरंग उबाळे, डाॅ. जगताप, जालिंदर चव्हाण, सरपंच पप्पु कात्रजकर, मोहन पवार, संजय कार्ले, महालिंग कोरे, तात्याराम पोकळे सह आदी उपस्थित होते.
एसआरपीएफचे जवान इतक्या वेळ वेठीस धरणं योग्य आहे का ? हे जवान जनतेच्या सुरक्षेसाठी आहेत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे जवान काम करत असतात. काल पवार साहेबांच्या नातवाने कुसडगावमध्ये जो काही स्टंट केला तो कसा बेकायदेशीर होता, राजशिष्टाचार काय असतो, हे पवार साहेबांनी उद्याच्या जामखेड दौर्यातील भाषणात बोललं पाहिजे. कारण कर्जत जामखेड सह राज्यातील जनता याबाबत उत्तर मागु इच्छिते, असे ट्विट आमदार शिंदे यांनी केले.
आमदार शिंदे म्हणाले, आदरणीय पवार साहेब उद्या जामखेडमध्ये येणार आहेत, ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री होते, देशाचे कृषि, संरक्षण मंत्री होते. ते राज्याचे व देशाचे विरोधीपक्ष नेते होते. त्यांना राजशिष्टाचार चांगला माहित आहे, कुसडगावला जे काही घडलं त्यावर त्यांनी बोललं पाहिजे ही जनतेची इच्छा आहे, राजशिष्टाचार काय असतो हे त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.






